मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निकाल देताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.
उद्धव यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा सरकार आणलं असतं, अशी टिप्पणी केली. या टिप्पणीवर आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी छोटेखानी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पवार यांनी म्हटले की, काही निर्णय अजून व्हायचे आहेत, असं मला वाटतं. राज्यकर्त्यांविरोधात सुप्रीम कोर्टाने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. राज्यपालांची भूमिका चुकीची होती. हे कोर्टाने नमूद केले आहे. घटनात्मक संस्थांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडायची असते. राज्यपालांची भुमिका चुकीची राहीली होती याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता तत्कालीन राज्यपाल राज्यात नाहीत, त्यामुळे फार चर्चेला अर्थ नाही, असेही पवार यांनी म्हटले.
विधिमंडळ पक्ष हा पक्ष नसून राजकीय पक्ष हाच पक्ष असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असं वाटत नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारले असता, पवार यांनी सांगितले की, उद्धव यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात राजीनाम्याबाबत सविस्तरपणे लिहिलं आहे. मी मांडलेल्या भूमिकेवर काही मित्र नाराज झाले होते. त्यावर आता चर्चेला काही अर्थ नाही. शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्रितपणे जोमाने काम करू असेही शरद पवार यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…
उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिली नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मी राजीनामा दिला नसता तर मी परत मुख्यमंत्री झालो असतो, पण ही लढाई माझ्यासाठी नाहीये, जनतेसाठी आहे, लोकशाहीसाठी आहे, असं म्हटलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:33 11-05-2023
