मुंबई : महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला.
महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. सरकारला मिळालेलं जीवदान हे तात्पुरते असून सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रमध्ये बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्यायालयाने परखड भाष्य केले आहे. बाळासाहेबांनी ज्या सेनेवर प्रेम केलं ती सेना भाजपच्या दावणीला बांधण्याचा डाव न्यायालयाने उघडा पडला आहे. अध्यक्षांनी लवकरात लवकर परदेश दौरा झाल्यावर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी काही वेडेवाकडे केले तर निवडणूक आयोगाच्या विरोधात ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालयात गेलो तसेच आम्ही अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुद्धा न्यायालयात जाणार.
33 देशात आपले धिंडवडे निघू नये म्हणून अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा
महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. महाराष्ट्रची बदनामी थांबली पाहिजे. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तुमची बदनामी जगभरात होईल. त्यामुळे लोकशाही जिवंत राहण्यासाठी 33 देशात आपले धिंडवडे निघू नये म्हणून अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा. विधानसभा अध्यक्ष आधी आमच्याकडे होते. मग राष्ट्रवादीत गेले आणि आता भाजपात आहेत. त्यांना राजकीय प्रवासाची माहिती आहे. प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली आङे.
अध्यक्षांनी वेळेत निर्णय घ्यावा, यासाठी पत्र पाठवणार
अनिल परब म्हणाले, शेड्युल 10 च्या विरोधात अध्यक्षांनी काम केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नेमणूक सुद्धा बेकायदेशीर ठरते. आम्ही अध्यक्षांना ही कॉपी देऊन रिजनेबल टाइममध्ये निर्णय घ्यावा असे पत्र देणार आहे. तसेच या सगळ्याला जास्त वेळ लागू नये अशी विनंती आम्ही अध्यक्षांना करणार आहे. अंतिम निर्णय अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे.
सुनावणीत पक्ष, नाव आणि चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता
पुढच्या आठवड्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत पक्ष, नाव आणि चिन्ह गोठवला जाण्याची शक्यता असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 12-05-2023