रत्नागिरी : काजू पिकाच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना लागू केली असून, त्यात रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्हे आणि चंदगड, आजरा हे कोल्हापूरमधील दोन तालुके समाविष्ट आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा ५३ कोटीचा आराखडा तयार झाला आहे. यामध्ये सर्वाधिक निधी जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी साडेसोळा कोटी रुपये ठेवण्यात आला असून ४५ हजार ४७८ जणांना लाभ दिला जाणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्र अनुदान ७ लाख ५० हजार रुपये प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन ७५ हजार रुपये देण्यात येते. काजू योजनेंतर्गत जिल्ह्याचा आराखडा कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये रोपवाटिकेसाठी ६० लाख रुपये, काजू कलमांसाठी २ कोटी २५ लाख, प्लास्टिक आच्छादनासह शेततळे ९३ लाख ७५ हजार, सिंचनाकरिता विहीर ६ कोटी २५ लाख, टिमॉस्कुटो नियंत्रणाकरिता पिकसंरक्षण ५ कोटी ५९ लाख, काजूबागेमधील तणनियंत्रण ३ कोटी, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन १६ कोटी ५० लाख, काजू तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण १ कोटी ५० लाख, काजूप्रक्रिया उद्योग आधुनिकीकरण ४ कोटी १ लाख, पॅकहाऊस व ड्रॉईंग यार्ड ९ कोटी, काजूबोंडावर प्रक्रियेकरिता ३ कोटी आणि ओले काजूगर काढणी व प्रक्रियेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाटीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज हा महा ई-सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयातून करता येतील. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, ८ अ, बॅंकपासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 13-05-2023
