◼️ दहा लाखांचे वितरण; आजपासून वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम सुरू
चिपळूण : निधीअभावी वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम ठप्प होऊ नये या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजनमधून गाळ काढण्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १० लाखांचा निधी डिझेल खर्चासाठी वितरण करण्यात आला आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे ठप्प झालेले काम पुन्हा सुरू होणार आहे.
ऐन पावसाळा तोंडावर असताना गोवळकोट बंदर येथील बेट काढले जावे, यासाठी नाम फाऊंडेशनची यंत्रणा मेहनत घेत असून, बुधवारपासून हे काम पुन्हा सुरू होणार आहे.
पहिल्या टप्प्यात शासनाने जलसंपदा विभाग, यांत्रिकी विभाग यांच्यामार्फत काम सुरू करण्यात आले तर शिव नदीतील गाळ नाम फाऊंडेशनच्या मदतीने काढण्यात आला. यावर्षी इंधन पुरवठ्यासाठी ‘नाम’ला १ कोटी ३० लाख रूपये दिले जाणार होते. त्यापैकी १८ एप्रिलपर्यंत १ कोटी २० लाखांचे इंधन पुरवले गेले.
दुसऱ्या टप्प्यासाठी ५ कोटी २१ लाखांचे अंदाजपत्रक यांत्रिकी
विभागाने तयार कले असून, त्यासाठीही निधीची गरज लागणार आहे. त्यातील ४ कोटी ८६ लाखांच्या खर्चाला तीन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, हा निधी कधी मिळेल याची कल्पना नाही. त्यामुळे गाळ उपसा थांबणार नाही यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनकडून खेड, संगमेश्वरला दिलेला ३६ लाखांचा निधी चिपळूणकडे वळविला. तरीही काम आटोक्यात येत नव्हते. इंधन खर्च नाही म्हणून हे काम नामने थांबविले होते. अखेर पुन्हा जिल्हा नियोजनकडून गाळ काढण्यासाठी दहा लाखांचे वितरण करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 17-05-2023