रत्नागिरी : कोरोनामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याच धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांचा आर्थिक प्रश्न सोडवला आहे. येत्या खरीप हंगामात बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकीत असेल त्यांना राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अशा बळीराजांना उशीर न करता कर्ज द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल २०२० अखेर ही योजना संपायला पाहिजे होती. पण कोरोनाच्या संकटामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी राहिली आहे. बँकांनी आता येत्या खरीप हंगामासाठी या शेतकऱ्यांची खाती थकीत गृहीत न धरता त्यांनाही नवीन पीक कर्ज देणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांचे आधीचे थकीत कर्ज मुक्त करण्याची सूचना प्रशासनाने केल्या आहेत.