नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि आपचे प्रमुख नेते दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश आणून दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता.
याच मुद्द्यावर आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि चर्चा केली. केंद्र सरकारने हा अध्यादेश आणून चुकीचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.
त्यामुळे संसदेत या अध्यादेशाला राष्ट्रवादी विरोध करणार असल्याचं पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीच्या लोकांचे काम हे सरकारने केलं पाहिजे, पण दिल्ली सरकारच्या अधिकारांवर केंद्र सरकारने गदा आणल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
राज्यसभेत या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित यावं असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
केंद्रातल्या ईडी आणि सीबीआय या संस्थांचा वापर करुन राज्यातली विरोधी पक्षांची सरकारं पाडली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगबद्दल सुप्रीम कोर्टानं सर्व अधिकार दिल्ली सरकारला दिले. हा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश जारी केला. याविरोधात केजरीवाल यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे..
राज्यसभेत हा अध्यादेश मंजूर होऊ द्यायचा नाही, असा प्रयत्न केजरीवाल करत आहेत. त्याचाच भाग म्हणून बुधवारी त्यांनी ठाकरेंची भेट घेतली, आणि आज ते शरद पवारांची भेटीला पोहोचले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 25-05-2023