रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे २० विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषीपूरक अभ्यासक्रम सुरू करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात निर्माण केलेल्या कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सोबत पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे होते.
सुमारे अर्धा एकर परिसरात केवळ सात महिन्यांत उभारण्यात आलेल्या या देखण्या इमारतीच्या बांधकामाचे कौतुक करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करायला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील विद्यार्थी, युवकांसाठी उद्योगधंद्यांच्या गरजांनुसार विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या केंद्रातून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक यांनी संस्थेचे विविध अभ्यासक्रम व उपक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आत्मीयतेने उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनींशी संवाद साधला.
याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औदुंबर जाधव, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूरज खंते, कौशल्य विकास केंद्राच्या प्राचार्या गौरीनंदा सावंत, कौशल्य विकास केंद्राचे अभ्यास प्रमुख अक्षय पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 25-05-2023
