रत्नागिरी : चक्रीवादळामुळे घरावरचे फुटलेले नळे बदलत असताना तरुणाला चक्कर आल्याने उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रशांत प्रकाश जाधव (वय ३४, रा. पूर्व बौद्धवाडी- वाटद) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी साडेबाराच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व विनोद वसंत जाधव (वय ३५, रा. पूर्व बौद्धवाडीवाटद ता. रत्नागिरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार मृत प्रशांत जाधव हे चक्रीवादळामुळे फुटलेले नळे बदलत होते. नळे बदलून झाल्यावर ते घराला लावलेल्या शिडीवरुन खाली उतरून शिडीवर खाली साडेअकरा सुमारास बसले असताना त्यांनी जाधव यांना हाक मारुन मला चक्कर येत आहे. मला धर म्हणू लागला. विनोद जाधव यांनी त्यांना उचलून घरात आणले. पाणी मारुन उठविण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांना तात्काळ खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.