रत्नागिरी : जिंदाल कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला चक्कर आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अमोल चरणदास नगराळे (वय ३४, रा. सध्या खंडाळा, रत्नागिरी. मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास जयगड येथील खासगी रुग्णालयात घडली. नगराळे हे जिंदाल कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होते. त्यांना चक्कर आली असल्याचे मेन गेट वरील सिक्युरिटी गार्ड गजानन मनोहर मांजरेकर यांच्या वॉकीटॉकीवरून खबर देणार नीलेश नंदकुमार घावरे (वय ३२, रा. प्रक्षाले निवासस्थान-खंडाळा) यांनी कळविले. घावरे यांनी नगराळे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने जयगड येथील ऊर्जा हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगराळे यांना तपासून मयत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलिस फौजदार साळवी करत आहेत.