रत्नागिरी : कोरोना लॉकडाउन कालावधीत गेले अडीच महिने वाचनालये देखील बंद आहेत. मात्र आता कार्यालये, व्यवसाय, उद्योग सुरू झाले आहेत, मात्र अद्याप वाचनालये सुरू करण्यासंदर्भात आदेश मिळालेले नाहीत. वाचनालये पूर्ण बंद असल्याने पावसाळ्याच्या काळात पुस्तकांची काळजी घेण्याकरिता व देवघेव विभाग सुरू करण्याकरिता परवानगी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेले अडीच महिने वाचनालये बंद असल्याने पुस्तके आता पावसाळ्याच्या दमट हवामानामुळे खराब होण्याची शक्यता आहे. वाचनालये पूर्ण बंद असल्याने पुस्तकांची देखभाल करता आलेली नाही. त्यामुळे बरीच दुर्मिळ पुस्तके खराब होण्याची, नष्ट होण्याची भीती वाटते, असेही अॅड. पटवर्धन म्हणाले. वाचनालयामध्ये योग्य काळजी घेत पुस्तकांची देवघेव होऊ शकते. मुक्त वाचन विभाग, अन्य सामूहिक उपक्रम बंद राहतील. मास्क वापर सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग राखण्याची खबरदारी घेत वाचनालय सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:18 AM 11-Jun-20