कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयचे ५२५ मिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल. त्यामुळे यंदा आयपीएल व्हावी यासाठी बीसीसीआय सर्व पर्यायांचा विचार करत असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पत्राद्वारे दिली. बीसीसीआय ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना घेण्यासही तयार असल्याचे गांगुलीने या पत्रात म्हटले आहे. परंतु, रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल घेणे हा शेवटचा पर्याय असेल असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएल प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल. परंतु, आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्यास आम्हाला ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित करावी लागेल. या स्पर्धेच्या वेळी जशी परिस्थिती असेल त्यानुसार आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. परंतु, त्याआधी आम्हाला ही स्पर्धा कधी आयोजित करायची हे निश्चित करावे लागेल. आम्हाला तारखा उपलब्ध हव्यात. त्याचप्रमाणे सरकारची परवानगीही गरजेची आहे, असे धुमाळ यांनी सांगितले.