मुंबई : महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर आज सोमवारी 15 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होणार आहेत. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहील. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत व देशातील मोहिमा आणि द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांच्यासमवेत संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सत्राचे आयोजन केले आहे. थेट परदेशी गुंतवणूकीसाठी शेर्पा म्हणून प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन हे देखील उपस्थित असणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:13 PM 15-Jun-20