अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत ना. उदय सामंत यांची महाधिवक्त्यांशी चर्चा

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास कोणकोणते पर्याय उपलब्ध असतील, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली. मंत्री सामंत यांनी मंगळवारी दुपारी कुंभकोणी यांची भेट घेतली. यावेळी परीक्षा रद्द केल्यास कायदेशीर अडचणी काय असतील, या संदर्भातील माहिती सामंत यांनी जाणून घेतली. राज्यात कोरोनाचे संकट आणि त्याचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे आपण या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सामंत यांनी सांगितले. मला विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे हित महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि त्यावर राजकारण करणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचे नाही, असेही ते म्हणाले. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थी हितासाठी घेतला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या एटीकेटीचा प्रश्नही सोडविला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:42 AM 17-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here