रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले बार्ज मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. पंधरा दिवस उधाणाच्या लाटा बार्ज येऊन धडकत आहेत. मागील पंधरा दिवस बार्ज मिऱ्या किनारी सुरक्षित असले तरी तीन दिवसांनी येणाऱ्या अमावस्येच्या भरतीचा परिणाम बार्जवर होण्याची शक्यता आहे. अमावस्येची भरती आणि समुद्राचे उधाण या बार्जसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. 21 जूनला अमावस्या आहे. याच दिवशी कांकणाकृती सूर्यग्रहण देखील आहे. याचा परिणाम समुद्राला येणाऱ्या भरतीवर होऊ शकतो. या दिवशी पाऊस आणि वारा असल्यास उधाणाच्या लाटा बार्जसाठी धोकादायक ठरू शकतात. पाच वर्षांपूर्वी मिऱ्या किनाऱ्यावर आलेले श्री जॉय बार्ज अशाच उधाणात पुन्हा वाहून गेले. यानंतर या बार्जचे पूर्णतः नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर पुढील 2 दिवसात बार्ज मिऱ्या किनाऱ्यावरून हलवण्याची तयारी संबंधीत कंपनीकडून केली जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:57 PM 17-Jun-20