ग्रामीण भागात एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

रत्नागिरी : एसटी प्रशासनाने जिल्ह्यात सर्वत्र बससेवा सुरू केली असली तरी ग्रामीण भागात आणि वस्तीच्या गाड्या अजून सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून सकाळी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन कामे आटोपून परतणाऱ्या प्रवाशांची अजूनही गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगाराने काही गावांमध्ये बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र त्या अत्यंत मर्यादित आहेत. दिवसभरातील कार्यालयीन कामे आटोपून सायंकाळी उशिरापर्यंत परतण्यासाठी ग्रामीण भागातील वस्तीच्या गाड्या सुरू होणे आवश्यक आहे. वस्तीसाठी राहणाऱ्या या गाड्या सकाळी लवकर पुन्हा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रवाना होतात. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच सोय होते. मात्र वस्तीच्या गाड्या बंद आहेत. दिवसा येणाऱ्या गाड्यांचेही वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद एसटीला मिळत नाही आणि प्रवाशांचीही सोय होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटीच्या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:10 PM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here