रत्नागिरी : मुंबईत ताप, काविळ, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. गणेशोत्सवात मुंबईकर मोठ्या संख्येने गावाला येणार असल्याने या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून २३ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ताप, काविळ, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया रुग्ण आढळल्यास औषधोपचार करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गावी येणाऱ्या नागरिकांमुळे आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके नेमून दिलेल्या ठिकाणी तैनात राहणार असून, गावी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 12/Sep/2023
