मुंबई : राज्य सरकारने ‘सर्व महत्त्वाची पदे’ आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जीआरही काढला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी कंत्राटी पद्धतीने भरती यासंदर्भात आपल्या ‘X’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की,’राज्य सरकारच’ कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या…
बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले….
रोहित पवार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते? सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या,” अशी टीका त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:54 PM 12/Sep/2023