मुंबई : गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर येत्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पण, गणेशोत्सवात पाऊस धिंगाणा घालणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, येते तीन ते चार दिवस मुंबईत कमी पाऊस पडेल. हा कालावधी अत्यंत कमी असेल. १४ ते १५ सप्टेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर जोरदार पाऊसधारा कोसळतील, असे त्या म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात मुंबई, रायगड, पालघर व ठाण्यात जोरदार पाऊस पडला. ७ सप्टेंबर रोजी तिहेरी अंकात पाऊस नोंदवला गेला. गेल्या २४ तासांत सांताक्रुझ येथील वेधशाळेने २ मिमी, तर कुलाबा वेधशाळेने ५ मिमी पाऊस नोंदवला.
मुंबईच्या हवामान बदलात अस्थिरता आली. त्याचा परिणाम पावसावर झाला. चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबईवरील पाऊस गायब झाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा रविवारी ९६.७९ टक्के आहे. तुलसी, विहार व मोडक सागर हे तलाव १०० टक्के भरले आहेत. तानसा ९९ टक्के, भातसा ९८ टक्के, मध्य वैतरणा ९७ टक्के, तर अप्पर वैतरणा ८८ टक्के भरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:03 PM 12/Sep/2023
