रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी तब्बल १३ लाख चाकरमानी कोकणात दाखल होणार असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयात १५ मदत केंद्र उभारण्यात आले असून १२७१ पोलीस कर्मचारी तर ८६ अधिकारी हे या काळात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असून कोणत्याही तक्रारी अथवा मदतीसाठी ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेव्दारे केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशोत्सव नियोजन विषयी उपाययोजना व तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आयोजन केले होते. कोकणातील गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेत साजरा केला जातो, या महत्त्वाच्या उत्सवासाठी लाखों चाकरमानी कोकणात दाखल होत असतात, यंदा १३ लाख चाकरमानी दाखल होणार आहेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन केले असून सर्व विभागांच्या यासंदर्भात बैठकाही घेण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून गावोगावी जाऊन बैठका घेतल्या जात आहेत, जवळपास ३१०० बसेस चाकरमान्यांना घेऊन शनिवार पासून जिल्हयात दाखल होणार आहेत यासाठी एसटी महामंडळ, पोलीस दल, महसूल विभागाकडून महामार्गावर मदत केंद्रही उभारण्यात आल्या आहेत. १३ ठिकाणी शांतता कमिटीची बैठक ही पोलीस दलाने यशस्वीपणे घेतल्या असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 16/Sep/2023
