मुंबई : आज संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं (IMD) दिली आहे.
राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला होता. त्यानंतर चालू सप्टेंबर महिन्यात देखील पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिकांचे नुकसान हे 50 टक्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर काही भागात शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं आजपासून राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 16-09-2023
