‘त्या’ निष्पाप मुलीच्या मृत्यूनंतर उघड्या खाणींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील निरबाडे मोहल्ला येथे दोन दिवसांपूर्वी नजराना अहमद शेख (९) या निष्पाप मुलीला उघड्या खाणीमुळे आपला जीव गमवावा लागला होता. तर तिची मोठी बहीण अरजीना अहमद शेख हिला वेळीच मदत मिळाल्याने या दुर्घटनेतून ती बचावली आहे. या घटनेमुळे निरबाडे गावावर शोककळा पसरली आहे. उघड्या दगड खाणीमुळेच या निष्पाप मुलीचा जीव गेला असल्याने या उघड्या दगड खाणींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिपळूण तालुक्यातील पाली-निरबाडे ते खेड तालुक्यातील मुसाड गावाच्या सिमेपर्यंत मोठ्या प्रमाणात दगड खाणी, खडीक्रशर आहेत. हे ठिकाण म्हणजे दगड-खडी व्यवसायाचे केंद्र बनले आहे. काही अधिकृत तर काही अनधिकृत दगड खाणी या ठिकाणी सुरू आहेत. या ठिकाणी बिनबोभाटपणे हा व्यवसाय सुरु आहे. दगड खोदकाम झाल्यानंतर या खाणी मोकळ्या सोडल्या जातात पावसाळ्यात त्या पाण्याने भरतात व मग तिथे जीवघेणे अपघात घडतात. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या खाणींवर कोणतेही कुंपण किंवा सुरक्षा बाळगली जात नाही. त्यामुळे नजराणा सारख्या निष्पाप मुलीचा बळी गेला आहे. यामुळे आता तरी संबंधित महसूल विभाग या दुर्घटनेतून जागा होणार आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे. तसेच संबंधित खाण मालकावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:33 PM 27-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here