राजापूर : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या पदांमुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला बसत आहे. त्यामुळे शासनाने रत्नागिरी जिल्हयासह राज्यातील रिक्त असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांची पदे भरून सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण समिती शाखा राजापूर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अग्रेशीत करण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याकडे ग्रामीण समितीचे अध्यक्ष दीपक नागले व पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केले. तलाठी आणि मंडळ अधिकारी संवर्गाच्या रिक्त पदांमुळे जनतेची होणारी गैरसोय आणि त्याचा प्रशासनावर पडणारा भार लक्षात घेता शासनाने ही रिक्त पदे भरावीत यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू असून, आपल्या निवेदनावर कार्यवाही होण्याचे दृष्टीने ते मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येईल, अशी ग्वाही नायब तहसीलदार पंडित यांनी दिली.
याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष सत्यवान कणेरी, सचिव चंद्रकांत जानस्कर, खजिनदार जितेंद्र पाटकर, कार्यकारिणी सदस्य प्रकाश मांडवकर, संतोष हातणकर, राजू काशिंगकर, प्रकाश लोळगे, मानसी दिवटे, श्रीकांत राघव, संतोष मोंडे, सावित्री कणेरी, माजी सैनिक सखाराम बावकर आदी उपस्थीत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 03/Nov/2023
