गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवभोजन योजनेत आजपर्यंत तब्बल 1 कोटी 870 थाळ्यांचे वितरण झाले आहे. राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 848 केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात 5 रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी-अधिकारी वर्ग आणि शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतुक केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:08 PM 01-Jul-20