अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात मोठी अपडेट: गृहमंत्री फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड

0

मुंबई : जालन्यातील अंतरवली सराटी लाठीचार्ज (Antarwali Sarathi Lathicharge) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे.

जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते याची माहिती मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहिती दिली. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत असं त्यात म्हटलं आहे.

जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या उपोषणस्थळी 23 ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती.

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते असा विरोधकांनी प्रश्न केला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here