रत्नागिरी : म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज रत्नागिरीत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. पारंपारिक अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रम पद्धतीला छेद देत उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. मागील पाच वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला रत्नागिरीतील सर्व मान्यवारांनी उपस्थिती लावली. सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

रंगमंचावर कुणीही नाही, प्रचंड मतांनी तब्बल तीन टर्म निवडून देणारे नागरिकच आज मान्यवर होते आणि त्यांच्याच हातातून या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. आजवर उदय सामंत यांच्या माध्यमातून सुमारे १९०० कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी तालुक्याला मिळाला. विकास कामांचा धडाका लावत पार पाडत असणारी त्यांची कारकीर्द या अहवालाच्या रुपात मांडण्यात आली आहेत. कार्य अहवालाचे प्रकाशन झाल्यावर अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या कारकीर्दीचे कौतुक केले
