रस्त्याशेजारी गटार नसल्याने पाणी घुसले घरांत

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यासह गुहागर तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देवघर येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर १२ जणांच्या घरात पाणी शिरल्याने या नागरिकांचेही नुकसान झाले आहे. गुहागर-चिपळूण मार्गावरील देवघरमध्ये मुसळधार पाऊस झाला. या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणच्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याशेजारील पाणी घरांमध्ये घुसले आणि त्यामुळे येथे १२ जणांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. गुहागर-विजापुर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. त्यामुळे हे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे. यापूर्वी असं कधीही घडले नव्हते. मात्र, यावेळी या रस्त्याच्या कामामुळे घरात पाणी घुसल्याने ही परस्थिती उद्भवली आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी तहसीलदार लता धोत्रे यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि संबंधित ठेकेदाराला त्वरित कारवाई करण्यास सांगून गटार काढण्यास सांगितले. तर ज्या ठिकाणी पाणी तुंबत आहे त्या ठिकाणी पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांनी आदेश दिले. यापुढे इथे कोणत्याही प्रकारचे पाणी साचणार नाही किंवा तुंबणार नाही त्याची खबरदारी घेण्याचे आदेशही तहसीलदारांनी ठेकेदाराला
दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here