रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून ३३ लाख ५० हजार ९९८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ३४५ गुन्हे नोंदवले आहेत. यापुढेही गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणे, बेकायदा मद्य विक्री अड्डयांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील. गावठी हातभट्टी दारु निर्मिती, विक्री केंद्र, बेकायदा मद्य वाहतूक व विक्री विषयी माहिती मिळाल्यास ती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी या कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी केले आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी या कार्यालयाने जिल्ह्यात ३४५ गुन्हे नोंद केले असून ३ हजार ८८४ लिटर गावठी दारू, २८७ लि. गोवा बनावटीचे विदेशी मद्य, २२२ लि. देशी मद्य व २२९ लि. महाराष्ट्रातील विदेशी मद्यासह तीन वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात अवैध मद्यविक्री होऊ नये, मद्य वाहतूक होऊ नये यासाठी रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्ह्यातील निरीक्षक कार्यालयाकडून संबंधित कार्यक्षेत्रात बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही उत्पादन शुल्क रत्नागिरी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 10-Jul-20