रत्नागिरी : राज्यातील किमान 10 जिल्ह्यांमध्ये पुराचे अस्मानी संकट ओढवल्याने राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी राज्यातील या आपत्तीच्या काळात स्वतःची गार्हाणी बाजुला ठेवून पीडितांना संपूर्ण मदत करण्यासाठी दि. 20 ऑगस्टचा नियोजित संप स्थगित केला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती अस्तित्वात आहे. या समितीच्या झेंड्याखाली 17 लाख कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाविरोधात 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार होते. परंतगेल्या आठवड्यात राज्यात आलेल्या अस्मानी संकटामुळे तेथील जनतेचे पूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या सर्व पूरग्रस्तांना सावरण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे.त्यामुळे राज्यातील बाधित जनतेला जीवनात स्थिर करण्यासाठी सर्व स्तरावरुन सक्रीय मदत देणे ही आजची गरज आहे. त्यामुळे हा संप स्थगित करण्यात आलेला असून राज्यातील 17 लाख कर्मचारी कर्तव्य भावनेने आपले एक दिवसाचे वेतन देउन राज्य शासनाला अर्थबळासाठी हातभार लावतील अशी घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केली आहे.
