प्रशासकाऐवजी कमी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्याव्यात : सुहास खंडागळे

0

रत्नागिरी : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येत असतानाच जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये योग्य ती खबरदारी घेऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी भूमिका मांडली आहे. तशी मागणी गाव विकास समितीमार्फत राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र हा प्रशासक पदावर असताना निरंकुशपणे कारभार करण्याची शक्यता अधिक आहे किंवा त्या प्रशासकाला राजकीय पार्श्वभूमी असल्यास त्याला राजकीय नेतृत्वाकडून मिळणाऱ्या सूचनांप्रमाणे तो काम करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निवडून आलेल्या सरपंचावर इतर सदस्यांचा अंकुश असतो. शिवाय ग्रामपंचायत सदस्य जनतेने निवडून दिलेले असतात. मात्र प्रशासकाकडून मनमानी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. दुसरी बाब म्हणजे गावांची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांत वाडीनिहाय मतदान यंत्रणा सक्षम करून निवडणूक घेणे शक्य आहे. टप्प्याटप्प्याने निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करता येईल का, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे. गावपातळीवर फिजिकल डिस्टन्स पाळणे सहज सोपे आहे. आता करोनाच्या काळातही गावगाडा सुरूच आहे. गावातील लोक योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यामुळे कमी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्याबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाने विचार करावा, अशी भूमिका श्री. खंडागळे यांनी मांडली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 18-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here