रत्नागिरी : जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबरोबरच कोरोना बळींची संख्याही सध्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यासमवेत दापोली तालुक्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. दि. २० जुलै पर्यंत दापोली तालुक्यात कोरोना बळींची संख्या १० अशी होती. याच काळात कोव्हीड या व्यतिरिक्तही अनेक पेशंट योग्य तो उपचार न झाल्याने दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता दापोली येथील उपजिल्हा रूणालयात तातडीने डेडिकेटेड कोरोना सेंटर (DCC) म्हणून सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हा सरचिटणीस केदार भिकाजी साठे भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी यांच्यातर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले आहे. एखाद्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे १७० km इतका प्रवास करून पाठवावे लागते. व्हेंटीलेटर युक्त रुग्णवाहिकांची कमतरताही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या सगळ्याचा विचार करता व संभाव्य मृत्यु दर कमी करण्याकरिता तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात DCC सेंटरला मान्यता मिळावी तसेच पाच व्हेंटीलेटरही तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी साठे यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 23-Jul-20