रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांसह एसटी बसेस सोडाव्यात, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. मुंबई, पुण्याहून चाकरमानी गावी आल्याशिवाय कोकणातील गणेशोत्सव साजरा होत नाही. गेल्या चार महिन्यांपासून करोनाच्या संकटामुळे मुंबई-पुण्यामध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी अडकून पडले आहेत. या काळात त्यांना ईपासदेखील उपलब्ध होऊ शकले नाहीत. जे आले, त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे किमान गणेशोत्सवासाठी तरी त्यांना सुखरूप गावी जाता यावे, यासाठी सरकारने व्यवस्था करावी, अशी कोकणवासीयांची माफक अपेक्षा आहे, असे श्री. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. गणेशोत्सव जवळ आला असला तरी शासनाकडून कसलाही स्पष्ट निर्णय होत नसल्यामुळे चाकरमानी व कोकणवासीयांमध्ये चलबिचल सुरू आहे. वेळीच निर्णय झाला नाही, तर कोकणवासीयांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. कोकणवासीय झुंडीने कोकणात यायला निघाले, तर करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकणवासीयांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या, एसटी बसेस तातडीने सूरू कराव्यात, असे श्री. जाधव यांनी पत्रातून केली आहे..
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 29-Jul-20