रत्नागिरी : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील उत्पादित क्षेत्रापैकी सुमारे तीस टक्के खरीप क्षेत्र धोक्यात आले आहे. अतिवृष्टीने अनेक भागात भातशेतीची हानी झाली असल्याने या वर्षी भात उत्पादनावर परिणाम होण्याची भीती कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पीकस्थिती पहाणीत तसा अहवाल नोदविण्यात आला आहे. यंदाचा पाऊस हंगाम रडतखडत सुरू झाला. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगमात मोसमी पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यात सुरू होती. तब्बल 12 दिवसाच्या प्रतीक्षेतनंतर मोसमी पावसाने सुरूवात केल्याने अनेक भागात केलेल्या पेरण्या सुकल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने सातत्य ठेवल्याने शेतकर्यामध्ये समाधान होते. त्यानंतर मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खेड, मंडणगड, दापोली, गुहागर चिपळूण, संगमेश्वर राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जोरदार पावसाने डोंगर खचण्याच्या घटना घडल्या तर काही भागात जमीनीला तडेही गेले. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र अडचणीत आले. त्यानुसार कृषी विभागाने पीकस्थितीची पाहणी केली. या पाहणीत अनेक भागात भात शेती धोक्यात आली आहे. काही भागात मुसळधार पावसाने उभी शेती आडवी केल्याने नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हगांमात 78 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 71 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आण्यात आले आहे. त्यापैकी 69 हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नागली करण्यात आली आहे. यापैकी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रात शेेतीची हानी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगमात भात उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती आहे. पावसाने जिल्ह्यात समाधानकारक वाटचाल केली असली तरी मध्यंतरी झालेल्या जोरदार पावासने जिल्ह्यात झालेली हानी हानी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस पडलेल्या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्याचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. मात्र, तरीही तालुक्याच्य ाकाही भागात अतिवृष्टीने जमीनीला भेगा गेल्याने भात शेती अडचणीत आली आहे.
