रत्नागिरी : मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाची स्वच्छता रत्नागिरीच्या सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या छावा प्रतिष्ठानने केली. सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सर्व कामे थांबली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित छावा प्रतिष्ठानने कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून मराठी साहित्यातील आद्य कवी केशवसुतांचे जन्मगाव असणाऱ्या मालगुंड गावी उभारलेल्या अत्याधुनिक कवी केशवसुत स्मारकाची स्वच्छता केली. सध्या शासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे योग्य ते नियम पाळून छावा प्रतिष्ठानने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. रविवारी सकाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील धावडे आणि सुनील आंग्रे यांच्या पुढाकाराने कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या सहकार्याने अभियानास सुरुवात झाली. त्यामध्ये या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पावसाने पडलेले खड्डे भरतानाच, निसर्ग आणि त्यानंतरच्या काळात झालेल्या वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करणे, लॉकडाउनच्या काळात वाढलेले गवत काढणे अशी कामे केली. स्मारकाच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करण्यात आला. अभियानाच्या सुरुवातीला स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे स्वागत केले. स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील धावडे, सुनील आंग्रे, सचिव समीर धावडे, कार्याध्यक्ष संतोष आंग्रे, खजिनदार गणेश कांबळे, प्रवक्ते संगम धावडे, प्रसिद्धी प्रमुख नितीन सूर्यकांत रोडे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत गोताड, सचिन धावडे, नंदकुमार धावडे, नीलेश कळंबटे, हरिश्चंद्र गोताड, राहुल धावडे, विजय धावडे, संदेश धावडे, एकेश धावडे, केशव शिवगण, सुदीप पवार, दिनेश धावडे, रितेश धावडे, मनोज मालप यांनी मेहनत घेतली. त्यांना स्मारकाच्या वतीने ग्रंथपाल श्रुती केळकर, कुमार डांगे, स्वप्नेश राजवाडकर यांनी सहकार्य केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 03-Aug-20