रत्नागिरी : देवळे गावामध्ये गेले पाच दिवसांपासून वीज नसल्यामुळे गावातील लोकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. सदर बाबतीत संबंधित यंत्रणेला (MSEB) याबाबत विचारणा केली असता संबंधितांकडून योग्य उत्तर मिळालेले नसून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे देवळे गावातील सुतारवाडी येथील रहिवासी श्री.हरिश्चंद्र विठोबा पांचाळ यांचे घरावर दिनांक ०३-०८-२०२० रोजी झालेल्या पाऊस व वादळामुळे विजेचा खांब पडलेला असून त्यांच्या घराचे नुकसान झाले असून सदर खांब संबंधित यंत्रणेकडून अजून पर्यन्त घरावरून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सदर बाब ही अत्यंत खेदजनक आहे. या एका गोष्टीमुळे गावातील सहा ते सात वाड्या अंधारात दिवस काढत आहेत. परंतु संबंधित यंत्रणेला याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. संबंधित यंत्रणेला भ्रमणध्वनिद्वारे संपर्क साधला असता अजून चार ते पाच दिवस लागतील आमच्या कंत्राटदारांकडे काम करण्यासाठी माणसे उपलब्ध नाहीत अशी उत्तरे मिळत आहेत त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच कंत्राटदार आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:41 PM 06-Aug-20