कोकणच्या धर्तीवर इतरांनाही ‘क्वांरटाइन’मध्ये सूट देण्याची मागणी

0

सातारा : गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्य सरकारनं कोकणातील चाकरमान्यांना करोनाच्या नियमावलीतून काही प्रमाणात सूट दिली आहे. क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गणपतीसाठी गावाकडे जाणाऱ्या राज्यातील इतर गणेशभक्तांनाही सूट देण्यात यावी,’ अशी मागणी आता पुढे आली आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील जनतेची ही मागणी सरकारला कळवली आहे. शिवेंद्रराजे यांनी साताऱ्यांचे पालकमंत्री व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र लिहिलं आहे. सातारा व जावळी तालुक्यातील हजारो ग्रामस्थ नोकरीच्या निमित्तानं मुंबई, नवी मुंबईत राहतात. गणपतीसाठी हे सगळे मोठ्या संख्येने दरवर्षी गावाकडे येत असतात. कोविड १९ च्या संकटाच्या परिस्थितीत सरकारने घालून दिलेल्या अटी, नियमांचे पालन करणे प्रत्येकावरच बंधनकारक आहे. मात्र, १४ दिवसांचा कालावधी खूपच जाचक आहे. त्यामुळं त्यात काही प्रमाणात सवलत द्यावी, असं शिवेंद्रराजे यांनी पत्रात म्हटलं आहे. कोकणातील गणेशभक्तांना दिलासा देताना राज्य सरकारनं अलीकडेच त्यांचा क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांवरून १० दिवस केला आहे. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील चाकरमान्यांना सूट देण्याची यावी, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 08-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here