रत्नागिरी : तालुक्यातील पाली ग्राम पंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत क्षेत्रात केलेल्या काटेकोर उपाययोजनांमुळे गेले सहा महिने गावाला कोरोना प्रादुर्भावापासून रोखण्यात यश आले आहे. ग्राम पंचायत स्तरावर कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आठवडा बाजारच्या बुधवारच्या दिवशी बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या रेड झोनमधील चाकरमानी गणेशोत्सवासाठी येत असले तरी पाली ग्रा.पं. दक्षता घेत आहे. पाली ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक व्यापाराला मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे. परिसरातील गाड्यावर बाहेरच्या जिल्ह्यात चालक म्हणून जाणाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांना सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. यासारख्या उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. या सर्व केलेल्या उपाययोजनांमुळे पाली गावाला कोरोना प्रादुर्भावापासून गेले सहा महिने रोखण्यात यश आले आहे. पाली गावपातळीवरील सर्व नियोजन ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच नितीन सावंतदेसाई, उपसरपंच मंगेश पांचाळ, माजी सरपंच रामभाऊ गराटे, प्रदीप घडशी, संदीप गराटे, ग्रामकृती व वाडीकृती दलाचे सर्व सदस्य, पाली पोलिस दरक्षेत्राच्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल वैष्णवी यादव, मोहन पाटील, विनायक राजवैद्य, सुमित चिले, पोलिस पाटील अमेय वेल्हाळ, विवेक सावंत, तंटामुक्त अध्यक्ष विवेक सावंत, ग्रा.पं. सदस्य, व्यापारी यांच्या सहकार्याने करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:19 PM 14-Aug-20