रत्नागिरी : दुर्घटना टाळण्यासाठी यावर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक ग्रामस्तरावर उत्सव सेवा मित्र पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. ही पथके सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य करणार आहेत. प्रशासनाच्या आढावा बैठकीत या पथकांचे नियोजन करण्यात येणार आहे. आगामी गणेशोत्सव काळात उत्सव मंडळांना सुरक्षित उत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रत्येक मंडळाने गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे सुरक्षित नियोजन करणे, मंडळाच्या कार्यक्रमास्थळी ध्वनी प्रदूषण रोखणे, सीसीटीव्ही निगराणी प्रणाली कार्यरत करणे आदी सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार या मार्गदर्शक प्रणालीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर उत्सव मित्र पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांनाही या पथकाची निर्मिती करण्याचे सूचित करण्यात आहे. ही पथके ऑनलाईन राहणार असून मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या संपर्कात राहणार आहेत.
