रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी-गणपतींचे विसर्जन होताच परतीच्या प्रवासाला निघाले असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पावसामुळे महामार्गावर पडलेले खड्डे चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने महामार्गावर खेड तालुक्यातील जगबुडी पुलावर वाहनांची कोंडी होत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवावर करोनाचे संकट असतानाही ई-पास, वैद्यकीय तपासणी, क्वारंटाइनचे अडथळे पार करून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. गणेशोत्सव साजरा करून गौरी-गणपतींना निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू व्हायला निघाले आहेत. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभुमीवर गेले काही महिने शुकशुकाट असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगालाही ब्रेक लागत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यावर खड्डे पडले असल्याने तेथून वाहने चालवताना चालकांचा कस लागत आहे. जोडरस्त्यावर पडलेल्या खड्डे आणि वाढलेली वर्दळ यामुळे तेथे अपघाताचीही भीती आहे. त्यामुळे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे संबधित ठेदेकाराकडून तात्काळ बुजवून घ्यावेत, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 31-Aug-20