नागपूर : गेल्या 100 वर्षात पूर्व विदर्भात प्रथमच उदभवलेली पूरपरिस्थिती ही अचानक निर्माण झाल्याने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्हयात प्रामुख्याने पीकहानी, घरे पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे, अशा स्वरुपाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने मानवीय दृष्टीकोनातून युध्दपातळीवर पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विभागीय आयुक्तांना दिले आहेत. पूरग्रस्त भागात सध्याच्या काळात महामारी पसरणार नाही यासाठी पिण्याचे शुध्द पाणी, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था, नियमित वीज पुरवठा, रोहीत्रे व रस्ते दुरूस्ती याकडे लक्ष वेधण्याचे निर्देश दिले आहेत. पडलेल्या घरांच्या संदर्भात अल्प, मध्यम व पुर्ण बाधीत या तीन प्रकारात सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामध्ये विशेष बाब म्हणून घरे दुरुस्ती व निर्माणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील अशा सुचना त्यांनी दिलेल्या आहेत. विभागातील नुकसानाच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी विस्तृत प्रस्ताव शासनाकडे सादर करावे. पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द असून निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 02-Sep-20