गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना राज्य सरकारने खूषखबर दिली आहे. कोकणात जाणर्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार्या विशेष करुन कोल्हापूरमार्गे जाणार्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सोमवारी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात गणपतीसाठी जाणार्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे श्री देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
