राजापूर : राजापूर शहरात वारंवार येणाऱ्या पूरस्थितीच्या अनुषंगाने शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या संगम परिसरासह दोन्ही नद्यांच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केल्याची माहिती काँग्रेसच्या माजी आमदार हस्नबानू खलिफे यांनी दिली शहरात पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूररस्थितीपासून कायमस्वरूपी मुक्तता होण्यासाठी नद्यांच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्यासारखी उपाययोजना व्हावी, अशी मागणी सौ. खलिफे यांनी सिंधुदुर्ग येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय जाहीर केला होता. या कामासाठी भरीव निधी देण्याचेही आश्वासन दिले होते. त्यानुसार कामाचा आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. त्यावेळी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि नगरसेवक सुभाष बाकाळकर, पालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, नोडल ऑफिसर जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते. या कामाचा जलसंपदा विभागातर्फे लवकरच आराखडा तयार केला जाणार आहे. कोदवली नदीत गणेश घाट ते नन्हेसाहेब पुलापर्यंत तर, अर्जुना नदीमध्ये गणेशघाट ते मारुती मंदिरपर्यंत ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 17-Sep-20