कुडाळ : येणार्या गणेशोत्सवामध्ये चिपी विमानतळावर विमाने आकाशात झेपावीत, यासाठी आमचा प्रयत्न होता. मात्र अलिकडेच झालेल्या पावसात चिपी विमानतळाची संरक्षक भिंत काही ठिकाणी कोसळली आहे. तसेच धावपट्टीवर माती आली आहे, या सर्व नैसर्गिक घटना आहेत. या त्रुटींमुळे विमान प्राधिकरण विभागाची चिपी विमानतळावरुन विमोड्डानास परवानगी मिळालेली नाही. पण येत्या काही महिन्यात चिपी विमानतळावर निश्चित विमाने उतरतील, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. गतवर्षी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी ना. केसरकर यांनी चिपी विमानतळावर गणपती बाप्पासह विमान उतरवले होते. त्यावेळी त्यांनी पुढच्या गणेशोत्सवा पासून या विमानतळावरुन नियमित विमान सेवा सुरू होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, गणेशोत्सवला आता चार दिवस शिल्लक असताना चिपी विमानतळावर विमान उतरविण्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. याबाबत ना.केसरकर यांना याबात विचारलं असता, ते म्हणाले, चिपी विमानतळावर आदोंलन झाले होते, 33 केव्हीची विद्युत लाईन विमानतळापर्यत जावु नये, याकरिता आदोंलन कुणी घडवल, हे सगळ्यांना माहीत आहे. माझ्याकडे गृहखाते आहे,त्यामुळे मी जबरदस्तीने वीज लाईन कधीही आणु शकलो असतो. पण लोकांवर जबरदस्ती करून मला काही करायचं नाही. कारण ते माझ्या स्वभावात नाही. म्हणुनच त्याठिकाणी नियोजनचा निधी वापरून 11केव्हीची लाईन दिली.परंतू विमानतळाच्या विकास कंपनीची सगळी मशिनरी ही 33केव्ही विदयुत दाबासाठी डिझाईन केलेली होती. त्यामुळे ती सर्व मशिनरी परत पाठवावी लागली. आता 11 केव्ही साठी आवश्यक मशिनरी अद्याप आलेली नाही. जोपर्यंत लाईट नाही तोपर्यंत काहीच होवु शकत नाही, असे सांगत ना. केसरकर यांनी विमानतळ सुरू न होण्यास विरोध कारणीभूत असल्याकडे अप्रत्यक्ष अंगुलीदर्शन केले.
