मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्याने अधिकाऱ्यावर निलंबनाचा बडगा

0

इंदूर : राजकाणी नेत्यांची आणि मंत्र्यांची अधिकाऱ्यांनी सरबराई करणं यात काही नवीन नाही. मात्र या कामासाठी नेमलेल्या मध्य प्रदेशातल्या एका अधिकाऱ्याला त्याचा फटका बसला. मुख्यमंत्र्यांना दिलेलं जेवण हे थंड होतं त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्यालाच निलंबित केल्याची घटना घडली आहे. सगळ्याच स्तरातून टीका झाल्याने ते निलंबन मागे घेण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे इंदूर विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांच्या खान पानाची व्यवस्था अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मनीष स्वामी या अधिकाऱ्यावर देण्यात आली होती. सरकारी प्रोटोकॉलनुसार सर्व काळजी घेण्याचे निर्देश त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. स्वामी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या जेवणाची व्यवस्था होती. नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री जेवणार असल्याचं ठरलं होतं. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्री चौहान हे हेलिकॉप्टरने न येता कारने आले. त्यांना पोहोचायला 2 तासांपेक्षा जास्त विलंब झाला. त्यामुळे त्यांनी जेवण हे पॅक करून गाडीतच देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे जेवण पॅक करून देण्यात आलं. नंतर मात्र त्याचा दर्जा योग्य नव्हता आणि जेवण थंड होत असं जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आलं. त्यामुळे प्रोटोकालचं पालन योग्य पद्धतीने झालं नाही असं सांगत त्यांनी संबंधित अधिकारी स्वामी यांचं निलंबन केलं. आपण सर्व ती काळजी घेतली होती. बाकी सर्व पदार्थ गरम होते. फक्त भाकरी थंड झाली होती. गाडीत असलेल्या एसीमुळे ती थंड झाली असावी असं कारण स्वामी यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या निलंबनाची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी हस्तक्षेप करून त्यांचं निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्वामी यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली असली तरी या मुख्यमंत्र्यांना दिलेलं थंड जेवण आणि त्यामुळे तापलेले राजकारण याची चर्चा मात्र अजुनही सुरूच आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here