देवगड : समुद्रात दक्षिणेचा वारा सुरू झाल्यामुळे समुद्र खवळला असून 7 सप्टेंबरपर्यंत मच्छीमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आल्याने आश्रयासाठी गुजरातमधील नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात दाखल होत आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने व ताशी 50 ते 55 किमी वेगाने वारे वाहत असल्याने वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून यामुळे समुद्र खवळला आहे.1 ते 7 सप्टेंबरपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खोल समुद्रात मच्छिमारी करीत असलेल्या गुजरात राज्यातील नौका जवळच असलेल्या व सुरक्षित बंदर म्हणून प्रसिध्द असलेल्या देवगड बंदरात आश्रयासाठी रविवारी सायंकाळपासून दाखल होत आहे. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यानंतर एक महिना झाला मात्र नौकांसाठी हा कालावधी असफल ठरला. देवगड बंदरात काही नौकांमालकांनी नौका लोटून मच्छिमासाठी पाठविल्या मात्र हंगामाच्या पहिल्याच महिन्यात नौकामालकांची पदरी निराशा आली.नौकांना निपल म्हाकूल मिळत होती. मात्र या मासळीमध्ये नौकामालकांचा डिझेलचा खर्चही भागत नसल्याने काहींनी नौका बंद अवस्थेत ठेवल्या यामुळे देवगडमधील मच्छिमारीही ठप्प झाली होती. मात्र इतर राज्यातील नौका खोल समुद्रात मच्छिमारी करीत असून सध्या बिघडलेल्या वातावरणामुळे नौकांनी देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे.गणेशाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच पावसानेही पुन्हा हजेरी लावली असून वादळी वार्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आल्याने मच्छीमारांनी मच्छीमारी व्यवसाय बंद ठेवला आहे.
