मुंबई : मुंबईसह राज्यभर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गणरायाच्या आगमनालाच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. यामुळे हिंदमाता, सायन आणि अन्य अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत काल, सोमवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू राहिली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. आज सकाळीही पावसाची संततधार कायम होती. नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान, आज कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
