मुंबई की बेंगळुरू, प्ले ऑफमध्ये पहिला कोण जाणार?, आज होणार फैसला

0

अबुधाबी : युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात आजची लढत खास अशी आहे. प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ कोणता असेल याचा निकाल आज लागणार आहे. अबुधाबीमध्ये आज बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयर चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. गुणतक्त्यात या दोन्ही संघांचे प्रत्येकी १४ गुण आहेत. रनरेटच्या आधारावर मुंबई पहिल्या तर बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या लढतीत जो संघ विजयी होईल तो प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई संघाला रोहित शर्मा शिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईचा ८ विकेटनी पराभव केला होता. तर रॉयल चॅलेंजर्सला देखील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
या सामन्यात सर्वाधिक चर्चा आहे ती रोहित शर्माच्या दुखापतीची. गेल्या दोन सामन्यात रोहित खेळला नाही. विशेष म्हणजे ज्या दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती त्याच दिवशी रोहित नेटमध्ये सराव करताना दिसला होता. मुंबई इंडियन्स अथवा बीसीसीआयकडून रोहितच्या फिटनेसबद्दल कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. रोहित नसल्यामुळे मुंबईला सौरभ तिवारी आणि इशान किशन या खेळाडूंवर विश्वास दाखवावा लागेल. क्विंटन डिकॉक राजस्थान विरुद्ध अपयशी ठरला होता. त्यामुळे या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. इशान आणि सुर्यकुमार यादव हे देखील महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात. हार्दिक पांड्याने राजस्थान विरुद्ध ७ षटकार मारले होते. या शिवाय संघाचे नेतृत्व करणारा किरोन पोलार्ड आणि क्रुणाल पांड्या देखील धमाकेदार फलंदाजी करू शकतात. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या दोघांनी मिळून ३३ विकेट घेतल्या आहेत. त्याच बरोबर जेम्स पॅटिनसन आणि नाथन कुल्टर नाइल यापैकी एकाची निवड संघात होऊ शकते. रॉयल चॅलेंजर्सच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान मुंबई समोर असेल. बेंगळुरूकडून एरॉन फिंच आणि देवदत्त पडिक्कल यांनी आतापर्यंत चांगली सुरूवात करून दिली आहे. एबी डिव्हिलियर्सला सातत्य दाखवण्याची गरज आहे. विराट कोहली तर धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ४१५ धावा केल्या आहेत. या शिवाय ख्रिस मॉरिस, मोइन अली, गुरकिरत मान हे देखील महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. नवदीप सैनी जखमी झाल्यामुळे बेंगळुरूची गोलंदाजीबाबत थोडी काळजी वाढली आहे. त्यामुळे मॉरिस, मोहम्मद सिरा आणि इसुरू उडाना यांची जबाबदारी वाढली आहे.

नंबर गेम-

दोन्ही संघात आतापर्यंत २६ लढती झाल्या आहेत त्यापैकी १६ मुंबई इंडियन्सने तर १० रॉयल चॅलेंजर्सने जिंकल्या आहेत

रॉयल चॅलेंजर्सची मुंबईविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या २३५ इतकी आहे तर मुंबईची सर्वोच्च धावसंख्या २१३ आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 28-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here