गणेशोत्सव झाल्यानंतर समुद्रात विसर्जित केल्यानंतर पुन्हा किनाऱ्यावर वाहत आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती आणि निर्माल्य पुन्हा विसर्जन करण्याचा उपक्रम जिद्दी माउंटेनिअरिंगतर्फे यावर्षीही राबविण्यात येणार आहे. यावर्षी हा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. ८ सप्टेंबर) होणार आहे.
गणेशोत्सव पूर्ण झाल्यानंतर गणेशाच्या मूर्ती आणि निर्माल्य समुद्रात विसर्जित केले जाते. मात्र मूर्ती पाण्यात विरघळणाऱ्या नसल्याने तसेच निर्माल्य कुजणारे नसल्याने समुद्राच्या भरतीच्या वेळी पुन्हा वाहून किनाऱ्यावर येते. त्यामुळे मूर्ती आणि निर्माल्याची विटंबना होते. ते टाळण्यासाठी सर्वांनी मुळातच शाडूच्या मातीच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचे आवाहन केले जाते.
मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. न विरघळणाऱ्या मूर्तींचे पूजन केले जाते. प्लास्टिकसह अन्य न कुजणाऱ्या वस्तूंची आरास केली जाते आणि ते सारे निर्माल्य समुद्रात विसर्जित केले जाते. ते पुन्हा समुद्रात विसर्जित करण्याचा कार्यक्रम जिद्दी माउंटेनिअरिंगतर्फे येत्या रविवारी रत्नागिरीच्या मांडवी समुद्र किनाऱ्या सकाळी साडेसहा वाजता राबविण्यात येणार आहे. त्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 8390764464 या क्रमांकावर संपर्क साधावा.
