मुंबई : लालबागच्या राजाचे तब्बल २१ तासांच्या जल्लोषी मिरवणुकीनंतर आज (ता.१३) सकाळी साडे आठच्या सुमाराला गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाची १० दिवस मनोभावाने पूजा आणि सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला. निरोपाचा क्षण जवळ आल्यानंतर ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.मुंबईतील लालबागमध्ये गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. कुठे ढोलताशांचा दणदणाट… कुठे फटाक्यांची आतषबाजी… तर कुठे गुलालाची उधळण… आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष… अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. दरवर्षी प्रमाणे अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीचे फुले वाहून ठिकठिकाणी स्वागत आणि पूजा करण्यात आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती.
