मुंबई : देशातील विविध राज्यांनी केलेल्या करोना उपाययोजनांचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणूस केंद्रीत ठेवून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी कौतुक केले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. बैठकीत महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्राने घेतले आहेत. हे निर्णय अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 12-Nov-20