‘स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं वाटलं नव्हतं’ : अशोक चव्हाण

0

मुंबई : राज्यात तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्याने राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. विशेषतः कालचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यातून अनेकदा जाहीर कार्यक्रमांतून जुन्या कटू आठवणींना आता उजाळा मिळतोय. नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रात्री पार पडले. यावेळी अशोक चव्हाण तसंच खासदार हेमंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आम्ही तर कधी असा विचार देखील केला नव्हता. मात्र वर्षाभरापूर्वी पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राज्याला विकासकामांच्या बाबतीत सकारात्मक मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक आहे’, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी हेमंत पाटील यांनीही टोलेबाजी केली. ‘आठ दिवस ज्या वर्तमानपत्रामुळे मी तुरुंगात राहिलो त्याच वर्तमानपत्राच्या दिवाळी अंकाचं माझ्या हस्ते उद्घाटन होतंय, यापेक्षा अधिक भाग्याची कोणती गोष्ट असते’, असं खा. हेमंत पाटील म्हणाले. अशोक चव्हाण यांनी गुरुवारच्या नांदेडच्या कार्यक्रमात जरी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली असली तरी गेल्या महिन्यात (ऑक्टोबर) परभणीत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तक्रार केली होती. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. नंतर मात्र माझ्या बोलण्याचा माध्यमांनी विपर्यास केला, असं म्हणत त्या वादावर चव्हाण यांनी पडदा टाकला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 13-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here